जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करा:जिल्हाधिका-यांना ट्रायबल फोरमचे निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

पांढरकवडा – जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून ट्रायबल फोरमचे अमरावती विभागीय अध्यक्ष रितेश परचाके यांनी केली आहे.

कोवीड १९ प्रादुर्भावामुळे सन २०२० या वर्षात राज्यभरातील शाळांतील सर्वच वर्ग बंद होते.त्यानंतर शासनाने केलेल्या उपाययोजनामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही कालावधीनंतर सुधारल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली होती. १० नोव्हेंबर ,२०२० च्या शासन परिपत्रकान्वये इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग अटी व शर्ती निश्चित करुन २३ नोव्हेंबर ,२०२० पासून तर १८ जानेवारी,२०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी,२०२१ पासून सुरु करण्यास मान्यता दिली होती.

त्यानंतर राज्यात कोरानाची दुसरी लाट वाढत गेली.त्यामुळे शासनाने १५ एप्रिल , २०२१ पासून राज्यात पुन्हा लाँकडाऊन जाहीर केले. शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये टप्प्याटप्प्याने वर्ग सुरु करुन प्रथम आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहे.त्यानंतर पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. तद्नंतर गेल्या डिसेंबर मध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले.शाळा कश्याबश्या रुळावर आलेल्या होत्या. विद्यार्थी शाळेत जाऊन शिक्षण घेत होते.परंतू १० जानेवारी पासून १५ फेब्रुवारी पर्यंत पुन्हा शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून प्रदीर्घ काळ शाळेपासून दूर राहत असल्यामुळे त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर दूरगामी परिणाम होत आहे.इयत्ता पहीली ते आठवी पर्यंतची मुले घरीच असल्यामुळे त्यांच्यावर शारिरीक, मानसिक तणाव येऊन दुष्परिणाम होत आहे.पुढे जसा जसा कालावधी जाईल,तसे तसे नुकसान भरुन काढणे कठीण जाईल. आधी कोरोना नंतर डेल्टा आता ओमाँयक्रान हे विषाणूचे बदलते व्हेरिएंट भविष्यात ही सुरुच राहणार आहे.शेवटी मानवाला कोरोना सोबत जगावे लागणार आहे. त्यामुळे भितीपोटी सरसकट शाळा बंद करणे हा उपाय ठरु शकणार नाही.

शाळा ५०% विद्यार्थी क्षमतेने,शिफ्ट पद्धत असा अवलंब करुन चालू ठेवण्यात याव्यात. जेणेकरून शाळेत विद्यार्थी गेला पाहिजे व शिकला पाहिजे.त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग पुनश्च सुरु करण्याचे आदेश निर्गमित होऊन विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यात यावे अशी मागणी ट्रायबल फोरमचे अमरावती विभागीय अध्यक्ष रितेश परचाके यांनी केली आहे.