
नव्वदीच्या दशकात महाराष्ट्रात चाटे कोचिंग क्लासने चांगलीचं हवा केली होती. लातूर पॅटर्नने राज्यात धुमाकूळ घातलेला तो काळ. विशिष्ट तंत्रानं मुलांना शिकवून, त्यांच्याकडून तयारी करवून घेणं आणि त्यासाठी खाजगी क्लासेसची उभारणी हे चित्र नव्वदिच्या दशकात निर्माण झालं.
या खाजगी क्लासेसना राजमान्यता देणारं नाव म्हणजे मच्छिंद्र चाटे निर्मित चाटे कोचिंग क्लास. नंतर मात्र अशी घटना घडली की जिथे फुलं वेचली तिथे गोवर्या वेचण्याची वेळ चाटे कोचिंगवर आली.

भारतातली शिक्षण पद्धत विद्यार्थी घडविणारी नसून मार्कलिस्टला तारांकीत बनविणारी आहे हे काही नविन नाही. आज इतक्या वर्षांनंतरही मार्कांची ही जीवघेणी स्पर्धा बंद होणं तर दूरच पण कमीही झालेली दिसत नाही.
मुलाला उत्तम गूण असतील तरच त्याचं करियर आणि पर्यायानं भविष्य घडतं ही आदिम परंपरा भारतात आजही भक्तिभावानं जपली जाते. मुलांच्या मेंदूची क्षमता असो नसो प्रत्येक पाल्याला आजही मुलानं नव्वदहून जास्त टक्केवारी मिळवावी असं वाटत असतं.
आजही असे गूण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचं जाहिर कौतुक केलं जातं आणि कमी गूण मिळविणार्यांना नैराश्याकडे लोटलं जातं. अनुत्तीर्ण होणारे आजही आत्महत्येचा पर्याय निवडतात आणि हे सगळं आपल्या समाजाला बदलावसं वाट नाही ही शोकांतिका आहे.

या गुणांच्या भस्मासुरानं जन्माला घातलेल्या खाजगी शिकवण्या आणि त्यांना आलेलं राक्षसी स्वरूप हे हा चर्चेचा असला तरिही अद्याप चिंतेचा विषय नाही.
नव्वदच्या दशकानं जन्माला घातलेल्या खाजगी क्लासेसच्या राज्यव्यापी जाळ्यातलं एक नाव म्हणजे चाटे कोचिंग क्लासेस. एक काळ असा होता की दहावीला असणारा प्रत्येकजण चाटे क्लासेसला गेलो तर आयुष्य सार्थकी लागेल, करियर घडेल असं समजणारा होता.
डोळे पांढरे करणारे फीचे आकडे असले तरीही चाटेस्पर्श हा परिसस्पर्श असल्यानं आपला पाल्य या क्लासेसमधे शिकावा असं बहुतांश पालकांना वाटत असे. अल्पावधीत लोकप्रिय झालेले चाटे कोचिंग क्लासेस आणि त्याचे चाटे सर यांच्या आश्रयाला गेल्यावर दहावीत खणखणीत गूण मिळणारच याची खात्री होती.
या क्लासेसमधून चाटेसरांनी इतकी भरभक्कम कमाई केली की त्यांनी मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरवात केली. त्यांची निर्मिती असणारा पहिला मराठी चित्रपट “बिनधास्त” हा मराठी चित्रपटातील मैलाचा दगड मानला जातो.

त्या काळाच्या तुलनेत अत्यंत चकचकीत लूक असणारा हा मॉडर्न सिनेमा होता हे एक कारण आणि दुसरं म्हणजे यात सर्व कलाकार महिला होत्या. नावापुरता एक पुरुष ज्याचा चेहराही दिसत नाही वगळता सबकुछ महिला असणारा असा हा चित्रपट असल्यानं या चित्रपटाची आणि असा वेगळा प्रयोग मराठीत करणार्या निर्माता चाटे सरांची हवा झाली नसती तरच नवल होतं.
विरोधाभास असा की आपल्या पहिल्याच चित्रपटातून नारीशक्तीचा नारा देणार्या चाटे सरांच्या शिक्षकी कारकीर्दीचा आणि क्लासेसचा अंत एका मुलीचा विनयभंग केल्यानं झाला.

जितक्या जलद गतीनं चाटे क्लासेसनं राज्यव्यापी जाळं विणत लोकप्रियता कमावली तितक्याच जलद गतीनं ती घसरायला लागली होती. क्लासेसविषयी तक्रारी वाढल्या होत्या. पालक आणि विद्यार्थी ढिसाळ कारभाराबाबत नाराज होते.
नाराजीचं रुपांतर संतापात झालं आणि दादर येथील कार्यालयात दाद मागायला विद्यार्थी आणि पालक जमले. या चर्चेदरम्यान काही तोडगा तर निघालाच नाही मात्र नंतर याचं रुपांतर वादात झालं.

मच्छिंद्र चाटेंनी चर्चेसाठी आलेल्या एका विद्यार्थीचा विनयभंग केला अशी तक्रार नोंदविण्यात आली. या विद्यार्थीनीला कार्यालयाबाहेर काढताना चाटेंनी तिला अयोग्य पध्दतीनं हात लावला असं या तक्रारीत म्हणण्यात आलं होतं.
या प्रकरणात चाटेंना अटक करण्यात आली आणि या प्रकरणामुळेच चाटे क्लासेसची बदनामी होऊन लोकांनी या क्लासेसकडे पाठ फिरवायला सुरुवात केली.
आजसुद्धा खासगी कोचिंग क्लासेसची क्रेज कमी झालेली नाही, इंजिनियरिंग असो किंवा कॉमर्स क्लासेस तर हवेतच. तरी या सगळ्या गर्दीत चाटे कोचिंग क्लासेस हे नाव आता आपल्याला दिसणारच नाही.
चाटे यांच्यावर लागलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे ते कुणीच सांगू शकत नाही, पण ज्या विद्येच्या मंदिरात मुलांना उत्तम शिक्षण दिलं जायचं त्याच क्लासेसच्या मालकावर विनयभंगासारखे गंभीर आरोप लागणे हे फार दुर्दैवी आहे.
