
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
तालुक्यातील रावेरी पॉईंट टर्निंगवर शुक्रवारी २९ मे रोजी भरदुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. सध्या सर्वत्र कडक उन्हाळा असून सूर्यदेव अक्षरशः आग ओकत आहेत. अशा परिस्थितीत या दोन्ही दुकानांना आगीने आपल्या कवेत घेतले. या दुर्घटनेत दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, यवतमाळ, कळंब, राळेगाव अशा तीन अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियत्रंण मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राळेगाव शहरातील वर्दळीच्या रावेरी पॉईंट टर्निंगवर एक कोल्ड्रिंक (शीतपेय) आणि एक मोटारसायकल पंक्चर काढण्याचे दुकान (टपरी) आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास या दुकानांना अचानक आग लागली. तीव्र उन्हात आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. दुकान मालकांना आतले साहित्य बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. कोल्ड्रिंकच्या दुकानातील फ्रीज, मालाचा साठा आणि पंक्चर दुकानातील साहित्य व यंत्रसामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सर्व वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच राळेगाव नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. आग नियंत्रण येत नसल्याने थेट यवतमाळ, कळंब येथून देखील अग्निशमन दलाची मदत मागितली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक
नागरिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक परिश्रम सुरू केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, गरीब दुकानदारांचे हक्काचे उदरनिवार्हाचे साधन हिरावले गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
