झरीजामणी, मारेगाव, वणी येथे आरोग्य मेळावा जनतेने आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा,खासदार बाळू धानोरकर यांचे आवाहन

यवतमाळ : आरोग्य मेळाव्याचा माध्यमातून जनतेने आपल्या रोगाचे निदान करून उपचार करून घ्यावा असे लोकहितकारी आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून ट्रामा केअर ग्रामीण रुग्णालय वणी, ग्रामीण रुग्णालय मारेगाव, ग्रामीण रुग्णालय झरी जामणी येथे आरोग्य मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्यामध्ये रुग्णांची तपासणी करून आवश्यक सेवांचा लाभ दिल्या जात आहे. विविध आजार, आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची माहिती व उपाययोजना इत्यादी कार्यक्रम या मेळाव्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

याप्रसंगी आमदार संजीव रेड्डी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा शल्य चिकित्सक आर. डी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी पी. एस चव्हाण, ज्ञानेश्वर कोडापे, आरोग्य सभापती दिनेश जयस्वाल, माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष कुलसंगे, प्रमोद वासेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, वैद्यकीय अधीक्षक अमित कारेमोरे यांची उपस्थिती होती.

खासदार बाळू धानोरकर पुढे बोलताना म्हणाले कि, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी अधिक प्रभावी करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे या आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून आरोग्याचे निदान व उपचार करणे अधिक सहज शक्य होणार आहे. त्यामुळे मोठ्या दुर्गम आजारापासून देखील त्यांच्या बचाव करता येईल. त्यामुळे सर्वांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.