
बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. समाजातील उपेक्षित व अनाथ बालकांच्या चेहर्यावर आनंदी हास्य फुलावे म्हणून ग्रामदुत फाऊंडेशनने रक्षाबंधनाचा मंगल सोहळा सामाजिक भावनेतून साजरा केला. राजूरा येथील स्वामी विवेकानंद अनाथ आश्रमातील मुलांसोबत संचालिका निशा चटप यांनी रक्षाबंधन उत्सव साजरा करुन अनाथ मुलांच्या मनात विश्वासाचे, प्रेमाचे व आपुलकीचे नाते तयार करून सामाजिक बंधुभाव जपला.
ग्रामदुत फाऊंडेशन, नांदाचे अध्यक्ष साहित्यिक रत्नाकर चटप यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाचा उपक्रम पार पडला. अनाथाश्रमातील मुलांसोबत प्रेमाचे, बंधुभावाचे नाते दृढ करुन त्यांना भविष्यात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांचे पाठीराखे म्हणून आपल्याला योगदान देता यावे, ही प्रांजळ भुमीका यावेळी त्यांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमीत्ताने ओवाळणी करुन बंधुभाव जपणारी राखी संचालिका निशा चटप यांनी अनाथाश्रमातील मुलांना बांधली. तसेच फळवाटप करण्यात आले.
या सोहळ्याने भारावून चिमुकल्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भाऊराव बोबडे, अॕङ .दीपक चटप, सुरज गव्हाने, अमोल वाघाडे यांची विशेष उपस्थिती होती.
