
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णात वाढ होत आहे. कोरोना विषाणू लागण झालेल्या लोकांच्या मृत्यूच्या आकडा देखील वाढत आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येचा तुलनेत आरोग्य व्यवस्था मात्र तोकडी पडत आहे. चंद्रपूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असून मृत पावणाऱ्या व्यक्तीची संख्या वाढत आहे. हि चिंतेची बाब आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारी दाखविण्याची वेळ आली आहे. एका अपक्ष नगरसेविकेने तीन महिन्याचे मानधन दिले आहे. त्याच धर्तीवर सर्व नगरसेवकांनी पुढे येऊन मानधन देण्याची विनंती जनसामान्य आधार सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अमोल नगराळे यांनी केली आहे.
शासनाने कोविड केअर सेंटर काढलेले, तरीपण बेड मिळणे अशक्य झाले आहे. दररोज कितीतरी नागरिक बेड ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कोरोनाच्या लाटेत मृत्युमुखी पडत आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रत्येक प्रभागात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव असलेले नागरिक रोज निघत आहे. त्यामुळे या प्रभागातील नगरसेवक म्हणून सामाजिक दायित्व या नात्याने सर्व पक्षातील नगरसेवकांनी पुढे येऊन या लढाईत आपला सहभाव देण्याची आज गरज आहे. चंद्रपुर महानगर पालिकेतील सर्व नगरसेवकांनी आपले मानधन चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या कडे जमा करावे, जेणेकरून चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होतील.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या महानगरपालिकेत, तहसील कार्यालयात पोलीस स्टेशन, नगर परिषद, जिल्हा, परिषद, पंचायत समिती, शासकीय रुग्णालयात,डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय, आधी कर्मचारी. अधिकारी कोरोना या महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात ठेवून काम करीत आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वानी आपले मानधन या कार्यात दिल्यास देशातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थेपुढे आदर्श ठरणार आहे. त्यामुळे पुढे येऊन हे थोर काम करण्याची विनंती अमोल नगराळे यांनी नगरसेवकांना केली आहे.
