शेतीसाठी फायदेशीर ठरणारे गांडूळ खत प्रकल्पाला कृषी कन्येने दिली भेट


राळेगाव- मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी कु. साक्षी ज्ञानेश्वरराव थुटे हिने रावेरी येथील शेतकरी पांडुरंग उंडे यांच्या शेतातील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला भेट दिली यावेळी तिने अनेक माहितीचे विश्लेषण केले.
शेतात चांगले पीक मिळावे आणि भरघोस उत्पादन मिळावे यासाठी जगभरात अनेक प्रयोग झाले आहेत. वैज्ञानिक पातळीवर याचे आणखी प्रयोग सुरुच आहेत. यातून शेतकरी उत्पादन तर घेऊ लागला मात्र अशा खतांमुळे उत्पादनाचा दर्जा ढासळला आहे. पीकांच्या या निकृष्ठेमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा सामना करावा लागत आहे.रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो.या क्रियेला अवघा २४ तासांचा कालावधी लागतो. गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.गांडूळ खत कसे तयार करावे ?
सर्वप्रथम धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत, शेण, शिल्लक वैरण, काडीकचरा, पिकांची धसकटे अर्धवट कुजलेला कचरा गोळा करावा. त्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागावर गादी वाफा तयार करावा. खड्डा खोदायची गरज नाही. जमिनीवर सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा (पाचट, धसकट इ.) २-३ इंच जाडीचा थर घालावा. त्यामध्ये गांडुळे सोडावीत. नंतर हा गादीवाफा गोणपाटाने झाकून घ्यावा. वाफ्याचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादेत ठेवावे. जमीनीचा सामू ६.५ ते ७.५ असणे आवश्यक आहे. तसेच जमीनीत ४५ ते ५० टक्के ओलावा असावा.
गांडूळ खत निर्मिती करत असताना घ्यावयाची काळजी.
वाफ्यातील मातीची ढेकळे हाताने फोडावीत व आठवड्यातून एकदा वाफ्यातील कचरा खाली-वर करावा. या पद्धतीने महिना- सव्वा महिन्यात चहाच्या पावडरसारखे खत तयार होते.