
.
शहरातील नेहरू उद्यानाचे शासनाच्या निधीतून सौंदर्यीकरण करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले आहे. परंतु या उद्यानात येणाऱ्यांकडून दहा रुपये बेकायदेशीर शुल्क आकारले जात आहे. पालिकेत कोणताही ठराव न घेता बेकायदेशीर वसुली करीत असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष पी के टोंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत. नवीन वस्त्यांमध्ये धड रस्ते सुद्धा नाही. प्रभाग एक मधील लोकांना चार दिवसाआड पाणी मिळत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. गावात विकासात्मक कामाकडे दुर्लक्ष करीत पालिकेने केवळ बगीचे सौंदर्यीकरण करण्याकडे लक्ष दिलेले दिसताहेत. पूर्वीच्या नेहरू उद्यानाचे एक कोटी ७० लाख रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. या उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असे नामकरण करून १ ऑक्टोबर ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. परिणामी नागरिकांनी उद्यानात जायला सुरुवात केली होती. सदर उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी शासनाने अनुदान दिले तसेच जागा सुद्धा शासनाची असतांना पालिकेने उद्यानात प्रवेश करणाऱ्यांसाठी १० रुपये बेकायदेशीर शुल्क आकारले आहे. पालिकेत कोणताही ठराव न घेता त्रिसदस्यीय समितीलाविश्वासात न घेता बेकायदेशीर वसुलीचा फंडा उभारला आहे. एकीकडे शासनाची जागा,शासनाचे अनुदान असतांना नगर पालिका मनमानी करीत गावातील नागरिकांकडून वसुली करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात प्रवेश करण्यासाठी बेकायदेशीर वसुली करण्यात येत असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष पी के टोंगे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे करीत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे
