
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भारतीय जनता पार्टी तालुका राळेगावच्या वतीने पेट्रोल भाववाढ कमी करण्यासाठी आ,प्रा डॉ अशोक उईके तथा तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वात व भाजपा शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर यांच्या उपस्थितीत पेट्रोल डिझेल भाव वाढ कमी करावी या मागणीचे निवेदन आज शुक्रवार दि 12 नोव्हेम्बर रोजी मा. मुख्यमंत्र्यांना तहशीलदारामार्फत देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे.
मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकारनेही कर कपात करून अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि, अजूनही महाराष्ट्र सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपाशासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही.
राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात.
महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी. तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत असून यावर जर लवकर निर्णय झाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येतील असा इशारा देण्यात आला.ह्यावेळी भाजपचे सागर वर्मा,गजानन लढी,संदीप तेलंगे,विनायक महाजन,विशाल पंढरपुरे,शुभम मुके,प्रफुल कोल्हे,रंजित ठाकरे,पारस वर्मा,शैलेश कांबळे, सुधाकर गेडाम,अजय बुच ,अरुण शिवणकर,दिनेश गोहणे,सह अनेक भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
