गरजूंना मदत करण्याचा देवानंद पवार यांचा उपक्रम स्तुत्य: माणिकरावजी ठाकरे

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

गरिबांचे जीवनमान उंचावण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गरिबांना मदत करणे हीच काँग्रेसची संस्कृती आहे. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी देवानंद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यातून अनेक गरजूंना महत्त्वपूर्ण मदत मिळत आहे. त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे यांनी केले.

रविवारी विद्यमान प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश काँग्रेसतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माणिकरावजी ठाकरे बोलत होते. सामान्य माणसाला मदत करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. गरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेसने अनेक योजना राबविल्या. तीच वाटचाल यापुढेही राज्यात सुरू ठेवणे ही काँग्रेसची भूमिका आहे. त्या भूमिकेशी अगदी सुसंगत उपक्रम देवानंद पवार यांनी हाती घेतला आहे. अडल्या-नडल्या शेतकऱ्यांना बियाणे वाटप करतानाही त्यात बियाण्यांच्या दर्जावर विशेष लक्ष देण्यात आल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला.
कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर होते. यावेळी विचारपीठावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कार्यक्रमाचे आयोजक देवानंद पवार, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लभाऊ मानकर, नगरसेवक जावेद अन्सारी, चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवाई, उषा दिवटे, शेतकरी नेते राजेंद्र हेंडवे, अशोक भुतडा, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव खडसे, अरुण राऊत, किरण कुमरे, अशोक भुतडा, प्रियंका बिडकर, उमेश इंगळे, घनश्याम अत्रे, अरुण ठाकूर, कैलास सुलभेवार, मिनाक्षी सावळकर, मुकेश देशभ्रतार, प्रा. विठ्ठल आडे, भास्कर सावरकर, आनंद लोखंडे, बालू काळे, आशीष महल्ले, विशाल पावडे आदी उपस्थित होते.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर म्हणाले, इथे गरजू शेतकऱ्यांना जे बियाणे वाटप केले जात आहे, ते अत्यंत दर्जेदार आहे. मी स्वत:च्या शंभर एकर शेतात हेच बियाणे लावत असतो. त्यामुळे आयोजक देवानंद पवार यांनी मदत देतानाही किती काळजीपूर्वक नियोजन केले, हे निदर्शनास येते. तर ही मदत देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात सर्वेक्षण करून खरे गरजू शोधले. यात ‘आपला-परका` असा भेदभाव करण्यात आला नाही. नानाभाऊ पटोले हे सामाजिक जाणीव ठेवून राजकारण करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी हेमंतकुमार कांबळे यांनी केले. जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने यावेळी मदतीचे वाटप करण्यात आले.

सामाजिक उपक्रमांची रेलचेल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यवतमाळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या हस्ते शहरवासीयांसाठी 15 मोबाईल स्वच्छतागृहांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे यांच्या हस्ते मोफत बियाण्यांचे, तसेच धान्याचे वाटप करण्यात आले.