
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले असून जगातील जवळपास १९४ देशांनी त्यास मान्यता देऊन पूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे या निमित्ताने देश पातळीपासून ते गाव पातळी पर्यंत सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे . त्या निमित्याने तालुका कृषी अधिकारी अमोल मंचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक तुषार मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ मौजे जळका येथे साजरा करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व बापूसाहेब देशमुख माध्यमिक शाळा यांच्या सहभागातुन संपूर्ण गावात पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढावे याकरता शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणार्या विविध घोषणा देऊन प्रभात फेरी काढण्यात अली प्रभात फेरी मध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणारे माहितीपत्रके वाटप करण्यात आले. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढविणे, पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढविणे व पौष्टिक तृणधान्याची आरोग्य विषयक महत्त्व बाबत जनमानसात जनजागृती करणे, तृणधान्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्यासह विविध उपपदार्थ तयार करणे व त्यांचा आहारात समावेश वाढविणे असे उद्देश समोर ठेवण्यात आलेले आहेत
कार्यक्रमात कृषी सहाय्यक तुषार मेश्राम, एकात्मिक बाल विकास प्रकल्प च्या लता अवतारे यांनी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील मूल्य व त्याचे आहारातील महत्त्व या विषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली तसेच लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत आरोग्याच्या समस्या – स्थूलता , बद्धकोष्ठता , मधुमेह महिला व लहान मुलांमध्ये अनेमिया यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे नियमित सेवन करण्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आहारामध्ये ज्वारी , बाजरी, नाचणी, भगर, राळा यासारख्या पौष्टीक तृणधान्यांचा समावेश वाढविणे त्याचबरोबर सदरील पौष्टिक तृणधान्यांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ , बेकरीचे पदार्थ तयार करणे शक्य असून त्यांचा आहारात वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर केंद्र शासना मार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म उन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लक्ष रुपयांपर्यंत प्रक्रियेसाठी अनुदान उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी , युवकांनी , बचत गटाच्या महिलांनी लाभ घेवून प्रक्रिया उद्योग उभे करावेत असे सदर प्रसंगी बोलताना आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थित शेतकर्यांनी शेत तिथे तृणधान्ये व मिलेट ऑफ द मंथ या संकल्पना शेतकर्यांपर्यंत रुजवून आत्मसात करणे बाबतचे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक फुलजले व सहाय्यक शिक्षक मोहुर्ले यांनी पौष्टिक तृणधान्याचे मुलांच्या आरोग्यातील महत्व विषयी तसेच पौष्टीक तृणधान्य दिवसाचे महत्त्व विषद करून जास्तीत जास्त लोकांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढविणे बाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी गावातील सरपंच शंकर मडावी, जि.प.शाळेतील सहाय्यक शिक्षक हनुमंत कोयचाडे बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथिल मुख्याध्यापक अनिल इटेकर सहाय्यक शिक्षक शंकर मोहुर्ले, विनोद सातारकर, प्रवीण निमट, निलेश कोल्हे, संजिव मडावी, मधुकर परचाके,शिपाई गणेश गाडे आशा वर्कर वंदना कुटे महिला व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
