तलवारीने सपासप वार करून दगडाने ठेचले; चार मारेकऱ्यांना अटक
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी युवकाला पार्टीसाठी नेऊन तलवारीने सपासप वार करण्यासह दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली. ही घटना १० जुलै रोजी मुलकीतील इश्वरनगर परिसरातील जंगलात घडली. शुक्रवारी युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असून, एलसीबीने मुख्य मारेकऱ्यासह चार जणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
रोहित भानुदास भानावत (२६) रा. बेले ले-आउट, जांब रोड यवतमाळ असे मृतकाचे तर वैभव नरेंद्र घोडाम (१८) रा. रामकृष्णनगर, मुलकी, रवी रामराव उईके (१९) रा. देवनगर मुलकी, यवतमाळ, सूरज उर्फ मुन्ना देविदास धुर्वे (२४) रा. आशीर्वादनगर, यवतमाळ, अमोल प्रभाकर गाडेकर (२५) रा. राधाकृष्णनगर, मुलकी अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. मृतकाने मुख्य मारेकरी वैभवला नवरात्रोत्सवादरम्यान तसेच तीन महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. मृतकाने सलग दोनदा मारहाण केल्याने वैभवच्या मनात प्रचंड राग होता. याच मारहाणीचा वचपा काढण्यासाठी वैभवने युवकाच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार १० जुलै रोजी मृतकाला मुलकीतील इश्वरनगर परिसरातील हनुमान मंदिरलगतच्या बाजुच्या जंगलात मित्रांसह पार्टीसाठी नेले. या ठिकाणी मृतकाला दारू पाजून तलवारीने सपासप वार केले. तसेच दगडाने ठेचून चेहरा विद्रूप करीत निघृण हत्या केली. वैभवच्या खुनाला मूर्तरुप दिल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि मृतदेह तेथेच सोडून वैभव मित्रांसह घटनास्थळावरून पसार झाला. मृतक रोहितचा दोन दिवसांपासून जंगलात मृतदेह पडून होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी एलसीबीला खुनाची माहिती मिळाली. त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांसह एलसीबी पथकाने घटनास्थळ गाठले. यावेळी कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृतकाची ओळख पटविण्यात आली.
नातेवाईकांनी कपड्यांवरून सदर मृतदेह रोहितचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर काही तासांतच मुख्य मारेकऱ्यासह अन्य तीन संशयितांना एलसीबीने ताब्यात घेतले. जुन्या वादातून रोहितचा खून केल्याची कबुली मुख्य मारेकऱ्याने दिल्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला. याबाबत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात राहुल भानुदास भानावत (३०) याने तक्रार दिली, त्यावरून पोलिसांनी खुनासह विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून, अधिक तपास पोलीस करीत आहे.
मिसिंगची नव्हती तक्रार, कपड्यांवरून पटली ओळख मृतक रोहित हा १० जुलै रोजी दुपारी एक वाजतापासून बेपत्ता झाला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. मात्र गत तीन दिवसांत रोहितच्या मिसिंगची तक्रार पोलिसांत दाखल झाली नव्हती. केवळ एलसीबीला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारेच या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. नातेवाईकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मृतदेहावरील कपड्यांवरून हा रोहितच असल्याची ओळख पटली.
एलसीबी’कडून अवघ्या काही तासांत छडा
मुलकीनजीकच्या जंगलात मृतदेह असल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. खून असल्याचे लक्षात येताच तपास चक्रे फिरवून अवघ्या काही तासांत चारही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, एपीआय विजय महाले, एपीआय अमोल मुडे, पीएसआय धनराज हाके, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर, बबलू चव्हाण, मिथून जाधव, सोहेल मिर्झा, नरेश राऊत आदींनी केली.
