
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य इमारत उभारली असली, तरी आरोग्य सेवा मात्र रामभरोसे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सुमारे 25 ते 30 गावे येतात. आदिवासी बहुल भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेची जबाबदारी या केंद्रावर आहे. केंद्रात अंदाजे 15 ते 20 कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेकवेळा केवळ दोन ते तीन कर्मचारीच ड्युटीवर उपस्थित असल्याचे दिसून येते. इतर कर्मचारी कुठे आहेत, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असतानाही ते नियमितपणे ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) चालवत नसल्याचा आरोप होत आहे. त्याऐवजी कंत्राटी स्वरूपातील सीएचओ (Community Health Officer) यांच्याकडून रुग्णांची तपासणी करून ओपीडी चालविली जात असल्याचे सांगितले जाते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ओपीडी चालविणे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर राहणे, हा रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. एखाद्या रुग्णाच्या उपचारात हलगर्जीपणा झाल्यास किंवा गंभीर परिणाम घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राळेगाव हा आदिवासी मतदारसंघ असून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उइके करतात. त्यामुळे वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांकडे मंत्री महोदय व वरिष्ठ आरोग्य अधिकारी लक्ष देऊन योग्य ती चौकशी करतील का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा नियमित व प्रभावी करण्याची मागणी केली आहे. तसेच गैरहजर कर्मचारी, ओपीडी व्यवस्थापन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे.
