
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रावेरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच श्री. राजेंद्र तेलंगे यांनी भूषविले. त्यांनी सभेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान रावेरी गावात लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे राबविनाण्यात येणार यावर सविस्तर माहिती दिली. विशेष अतिथी म्हणून श्रीमती किनाके, नायब तहसीलदार राळेगाव उपस्थित होत्या. याशिवाय ग्रामपंचायतचे उपसरपंच गजानन झोटिंग, सदस्य विनोद काकडे, सौ. विद्या ठावरी, ग्राम महसूल अधिकारी जयश्री गेडाम व कृषी सहाय्यक श्रद्धा वानखडे यांचीही उपस्थिती लाभली.
ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची उद्दिष्टे व घटक याबाबत विशेष माहिती देण्यात आली. या अभियानाचे मुख्य घटक सुशासन युक्त पंचायत ,सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)
,जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण,गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण,उपजीविका विकास, गृहनिर्माण व सामाजिक न्याय,लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे,नाविण्यपूर्ण उपक्रम या घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे ग्रामसभेत अधोरेखित करण्यात आले.
याशिवाय सभेत “सेवा पंधरवडा” या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. या काळात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच गावातील पांदण रस्त्यांच्या विकासाबाबत उपस्थितांना माहिती देऊन शेतकऱ्यांना सुलभ शेतीमार्ग उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
ग्रामसभेत गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, अंगणवाडीची सोय, रस्ते विकास, शेतीसंबंधी योजना, महिला बचतगटांचे बळकटीकरण आणि रोजगाराभिमुख उपक्रम यावरही चर्चा झाली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले विचार व सूचना मांडल्या. महिलांनी ग्रामविकासाच्या कामात सक्रिय सहभाग घेतला, तर युवकांनी नवनवीन कल्पना मांडल्या.
ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचतगट सदस्य, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी, श्री विनोद उमरतकर ग्राम पंचायत अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानून “गावाचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातूनच शक्य आहे” असा संदेश दिला.
