
ताजी बातमी – मुख्यमंत्र्यांनी आजच राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. सोबतच जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन जाहीर करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. अमरावती, यवतमाळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यानंतर तिथं लॉकडाऊन करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा न करता जनतेला चोवीस तास द्यावेत असंही म्हणाले. अचानक घोषीत केलेला लॉकडाऊन हा घातक असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच उद्या रात्रीपासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा तशा स्वरुपाची काही कडक बंधनं लादली जाऊ शकतात. विशेषत: विदर्भात जिथं स्थिती गंभीर आहे.शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली, जिंकण्याची जिद्द, इर्षा दिली. वार करायचा असेल, तर तलवारीचा हल्ला झेलायचा असेल तर ढाल हवी. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती ढाल नाही, पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल असायला हवी. मास्क घालायला विसरलो, तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करु शकतो. मास्क घालणं अनिवार्य आहे. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क वापरावा,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
