हिमायतनगरला बसस्थानक केंव्हा होणार…? ६५ वर्षांपासून प्रवाशी व शहरवासीयांना प्रतीक्षा

परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर

वाढोणा/हिमायतनगर शहरासारख्या तालुक्याच्या ठिकाणी मागील ६५ वर्षापासून बसस्थानक नसून प्रवाशांना बसण्यासाठी साधे टीन शेडही उभारलेले नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली व समाधीच्या ओट्यावर उन्हात व पावसात बसून प्रवाश्यांना एस.टी. बसची वाट बघावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. परिणामी श्रीक्षेत्र असेलल्या परमेश्वर नगरीत ये – जा करणार्यांना अनंत अडचनीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात आजवर अनेक पुढारी होऊन गेले आणि सध्या आहेतही तरी सुद्धा येथील बसस्थानकाच्या हा प्रश्न अजूनही रेंगाळत असून, हि प्रलंबित मागणी कधी पूर्ण होईल..? असा सवाल जनता विचारत आहे.
तालुका तिथे आगार.. या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी मागील १५ वर्षाच्या काळात सर्वत्र झाली. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात बसस्थानकाबरोबर आगराचाही प्रश्न निकाली काढल्या गेला होता. मात्र नव्याने तालुका होऊन २१ वर्ष लोटलेल्या हिमायतनगर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आगार तर नाहीच. परंतु साधे बस स्थानक सुद्धा बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात एस.टी.बसेस उभ्या केल्या जातात. या ठिकाणाहून विदर्भ – तेलंगणा, आंध्रप्रदेश – मराठवाडा आदी ठिकाणच्या गाड्यांची वर्दळ नेहमीच सुरु असते. तसेच रेल्वे रुंदीकरणानंतर एक्सप्रेस व पैसेंजर रेल्वगाड्या ह्या सकाळ, दुपार व सायंकाळी ठराविक वेळेत येतात.
मात्र जास्तीत जास्त प्रवाश्यांना बसचे वेळापत्रक कुठे आहे हे माहीत नसल्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. जेष्ठ नागरिक मात्र बसने प्रवास करण्यासाठी तासनतास भर उन्हात व पावसात वाट पाहत बसतात. प्रवाश्यांची हि समस्या लक्षात घेता परमेश्वर मंदिर कमेटीने बस उभ्या करण्याची सोय केलेली आहे. मात्र येथे टीनशेड नसल्यामुळे उन्हाळ्यात ऊन आणि पावसाळ्यात पावसाचा सामना करावा लागतो आहे. हिमायतनगर (वाठोणा) हे शहर एैतिहासिक असून, या शहराच्या परिसरात प्रामुख्याने राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य आणि देवगिरीच्या यादव काळातील मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशिल्पाचा सामावेष विखुरलेल्या अवस्थेेत दिसतात. त्यामुळे तालुक्यातील ५३ ग्रामपंचायती वाडी – तांड्यातील व बाहेरगावाहून ये – जा करणाऱ्या प्रवाश्यांना बसस्थानक उभारणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र एस.टी.महामंडळाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक, प्रवाशी भक्तानां नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील ६५ वर्षापासून येथिल काही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थामुळे झालेल्या ओढाताणीचा फटका शहरवासीय नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे जेष्ठ नागरिक सांगतात. खरे पाहता बसस्थानक हे रेल्वे लाईन नजीक असायला हवे मात्र या राजकीय व्यक्तींच्या मतभेदामुळे बसस्थानकाचे भिजत घोंगडे अजूनही जैसे थेच दिसत आहे.