
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला असून, येथील सुमारे ३४ आदिवासी मुलींची विक्री करण्यात आल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या खळबळजनक माहितीमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्याच्या महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ ‘सीआयडी’ (CID) मार्फत सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मनसेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी राळेगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. वरघट यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर फिरणारी ही ऑडिओ क्लिप जर सत्य असेल, तर हा प्रकार केवळ गुन्हा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला मोठा आघात आहे. राळेगाव सारख्या शहरातून एकाच वेळी ३४ मुली बेपत्ता होणे किंवा त्यांची विक्री होणे, हे एखाद्या मोठ्या आंतरराज्यीय मानवी तस्करीच्या रॅकेटचे लक्षण असू शकते. जर यामागे काही नराधम सक्रिय असतील, तर त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर कायदेशीर धडा शिकवणे ही काळाची गरज आहे. या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे माता-भगिनींच्या सुरक्षिततेशी खेळ करण्यासारखे आहे, अशी भावना मनसेने व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, भाजप आणि स्थानिक संघटनांनी याला ‘लव्ह जिहाद’ आणि मानवी तस्करीचा अँगल दिला असून राळेगावात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. मात्र, पोलीस प्रशासन आणि भाजपच्या दाव्यांमधील आकडेवारीत तफावत असल्याचे चित्र दिसत असतानाच, मनसेचे शंकर वरघट यांनी सत्य शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी लावून धरली आहे. केवळ पोलीस अहवालावर विसंबून न राहता, सीआयडीसारख्या निष्पक्ष यंत्रणेद्वारे या प्रकरणातील गूढ उकलणे आवश्यक आहे, जेणेकरून जनतेच्या मनातील भीती दूर होईल. या संवेदनशील प्रकरणात राज्य शासन आता काय निर्णय घेते आणि मनसेच्या या मागणीनंतर तपासाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.
