
.
विदर्भ राज्य निर्माण करावे, यासाठी संपूर्ण विदर्भात जनजागरण करून विदर्भाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी ” विदर्भ मिळवू औंदा ” या भूमिकेप्रमाणे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला व्हेरायटी चौकात मानवी शृंखला करून विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलनाचा बिगुल फुंकणार आहे. घटनेच्या कलम ३ प्रमाणे राज्य निर्मितीचा अधिकार केंद्र सरकारचा व संसदेचा असल्यामुळे पहिल्यांदा दिनांक ११ मार्च २०२२ रोजी केंद्र सरकारच्या नागपूर येथील सेमिनरी हिल्स कार्यालय संकुलासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर ही स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रभावीपणे राज्यकर्त्यांपुढे मांडण्यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्यातील काळात दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतरवरून संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्याची घोषणा करण्यात येत आहे. या सर्व आंदोलनात विदर्भातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भाचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ राज्य समितीने केले आहे.
सन १९०५ पासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला ११७ वर्षे लोटली आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य करावे या संबंधात जेवढे आयोग व समित्या झाल्या, या सर्वांचे अहवाल एकमुखाने स्वतंत्र विदर्भ राज्य सक्षम राज्य होऊ शकते म्हणुन निर्मिती व्हावी, याच बाजूचे आहे. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या प्रमुख पक्षांनी स्वतंत्र विदर्भ निर्माण व्हावे, असे ठराव केले आहेत. हे सर्व अनुकूल असतांना आणि देशात अन्य राज्यांची निर्मिती झाली असतांना मग विदर्भाचे स्वतंत्र राज्य देण्यास देशाची सत्ता सांभाळलेल्या प्रमुख पक्षांची उदासीनता का आहे, याविषयी विदर्भातील जनतेने समजून घेण्याची गरज आहे. या राजकिय पक्षांनी आपली पोळी भाजून सत्तेवर येण्यासाठी विदर्भातील भोळ्या जनतेचा वापर करून घेतला. ज्या प्रमुख राजकिय पक्षाचा प्रभाव कमी होतो, तो पक्ष हा विदर्भाचा मुद्दा मोठा गाजावाजा करून उचलून धरतो आणि सत्तेवर येताच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा अडगळीत टाकतो. भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी विदर्भाची घोर फसवणूक केली आहे. शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या भरोश्यावर विदर्भावर राज्य करायचे आहे, म्हणुन मराठी एक राज्य राहावे, अशी बेगडी साद घालत विरोध करतात. मात्र हिंदी,तेलगू भाषिक अनेक राज्य असतांना या म्हणण्याला काही अर्थ नाही. आता मात्र विदर्भातील जनता जागरूक झाली असून विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात हा स्वतंत्र विदर्भाचा विचार, त्यामागील उद्दिष्टे आणि स्वतंत्र विदर्भ झाल्यास होणारी समस्यांची सोडवणूक व होणारे फायदे यासंदर्भात सविस्तर जनजागृती करण्यात येणार आहे. हे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार पुकारण्याचे वर्षे आहे, अशी घोषणा समितीने केली आहे.
विदर्भाचे स्वतंत्र राज्य या मागणीमागे जसा राजकियदृष्ट्या दुर्लक्षित केल्याचा इतिहास आहे, तसाच आतापर्यंत झालेल्या प्रचंड लुटीची काळी बाजू आहे. दिनांक २८ सप्टेंबर १९५३ साली नागपूर करार करून येथील जनतेची संमती न घेता महाराष्ट्रात सामील करून घेतले, तेव्हापासुन अन्यायाची मालिका सुरू झाली ती आता वाढतच आहे. नागपूर करारानुसार नोकरी,सिंचन,वीज व अन्य विकासकामांसाठी निधी या सर्व बाबतीत लोकसंख्येनुसार २३ टक्के देण्याचे अभिवचन केव्हाच पायदळी तुडवून टाकण्यात आले आणि विदर्भाच्या वाट्याला फक्त अन्यायच आला. परिणामी येथे गरीबी, दारिद्रय़, शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, नक्षलवाद, प्रदूषण, बालमृत्यू, विज व सिंचन अनुशेष यासह अनेक प्रश्न मोठ्या स्वरुपात उभे राहिले. सुपीक जमीन, वन, पाणी, खनिज हे सर्व असतांना येथील लोकांचे दरडोई उत्पन्न घटले आणि पाश्चिम महाराष्ट्राने पद्धतशीर पणे विदर्भाची लूट केली. आतातर महाराष्ट्र कर्जाच्या खाईत लोटला असल्याने या राज्यात राहून विदर्भाचा विकास कधीही शक्य नाही, त्यामुळे विदर्भाचे स्वतंत्र राज्य होऊन चार वर्षात विदर्भ सुजलाम सुफलाम होईल अशा अर्थसंकल्पाची मांडणी आंदोलन समितीने केली आहे.
विदर्भातील लोकांना सुखी, समाधानी व सर्व सुविधायुक्त करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्यासह सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि आपले व पुढील पिढीचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हेच एकमेव उत्तर असून विदर्भातील १२० ही तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, तरूण, विद्यार्थी, नागरिक, महिला या सर्वानी मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा लढा प्रखरतेने लढून आपले स्वतःचे राज्य मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्राम गृह वणी येथे आज झालेल्या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले.यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती चे अध्यक्ष वामनराव चटप,पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज,राहुल खारकर,बाळासाहेब राजूरकर,शालिनीताई रासेकर,दशरथ पाटील,राहुल झट्टे,उद्धव हेपट, वंदना दगडी,अलकाताई मोवाडे,देवा बोबडे,होमदेव कन्नके,यासह विदर्भवादी उपस्थित होते.
