
चंद्रपूर/गडचिरोली: विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देवस्थान येथे १० फेब्रुवारी २०२६ पासून महाशिवरात्रीनिमित्त १५ दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या यात्रेसाठी महत्त्वाचा असलेल्या मूल ते चामोर्शी मार्गाची दुरवस्था झाली असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, या मागणीचे निवेदन मनसे जिल्हा सचिव श्री. किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
निवेदनातील मुख्य बाबी:
अपघाताची भीती: रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यात्रेदरम्यान होणारी गर्दी पाहता मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
प्रशासनाला सवाल: खराब रस्त्यामुळे होणाऱ्या संभाव्य जीवितहानीला जबाबदार कोण? असा खडा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे.
अंतिम इशारा: १० फेब्रुवारीपूर्वी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण न झाल्यास, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा किशोर मडगुलवार यांनी दिला आहे.
भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा हीच आमची प्रमुख भूमिका असल्याचे मडगुलवार यांनी स्पष्ट केले.
