यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द : बीसीसीआय,क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड

गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाताचा सामना रद्द करण्यात आला होता.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील (IPL 2021) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Vice-President BCCI Rajeev Shukla) यांनी अशी माहिती दिली आहे की, यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. घेण्यात आला आहे. याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबद्दल राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.
चेन्नई-कोलकात्यापाठोपाठ SRH आणि दिल्लीच्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण

SRH चा वृद्धीमान साहा कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर अमित मिश्रा देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. म्हणजेच या स्पर्धेतील एकूण तीन फ्रँचायझीमधील चार खेळाडू आता पॉझिटिव्ह आहेत. याआधी कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर दोन खेळाडू आधी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिवाय सीएसकेचे दोन सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

एकंदरीत आयपीएलवर कोरोनाचं सावट बळावत असताना बीसीसीआयकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातून आयपीएल रद्द करण्याची मागणी केली जात होती, मात्र कोरोनाच्या तणावाच्या परिस्थितीत मनोरंजनाचं काम करणारी आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानं अनेक चाहत्यांचा हिरमोड देखील झाला आहे.