
प्रतिनिधी : नितेश ताजणे वणी
तालुक्यातील वांजरी येथील खाणीमुळे तयार झालेल्या तळ्यात शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी खळबळजनक घटना घडली होती. शहरातील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. खाण धारकाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने तीन निष्पाप जीवांचा बळी गेला, असा आरोप करत खाणपट्टा धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच शासनातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शहर ए मदिना सोशल फाउंडेशन वणी तर्फे करण्यात आली आहे.
या प्रकरणी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत संस्थेद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
शनिवारी 2 सप्टेंबर ला आसिम अब्दुल सत्तार शेख (16), नुमान शेख साबिर शेख (16) दोघेही रा. एकता नगर व प्रतीक संजय मडावी (16) रा. प्रगती नगर हे तिघेही मित्र वांजरी येथे असलेल्या खदाणीच्या पाण्यात पोहायला गेले होते त्या ठिकाणी त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण समाजमन हेलावून गेले होते. मात्र मृतकाच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा खाणधारक कुणीही आले नाही. सदर खाण ही शासनाने उत्खणणासाठी भाडे तत्वावर दिली गेली आहे. पावसाळ्यात खाणीत पाणी साचत असल्याने उत्खणणाचे काम बंद असते. सदर खाण ही पाणी भरल्याने बंद अवस्थेत आहे. मात्र या ठिकाणी खाण धारकाने तारांचे कुंपण केले नाही. शिवाय या ठिकाणी सुरक्षा रक्षकही नाही. त्यामुळे तीन निष्पाप जीवांचा बळी गेल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी मिर्झा जफर बेग, रज्जाक पठाण, सिद्धीक रंगरेज, जाफर अली, मोहंमद आफताब अब्दुल सत्तार, अब्दुल आसीम अब्दुल आलीम , मोबिन शेख, सोहेल अहेमद आझाद अहेमद, अब्दुल सत्तार अब्दुल मुनाफ , साहिल हुसैन शेख, इरशाद शेख जब्बार शेख, संजय मडावी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
