
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
*
आज कल में राशन की कतारो में नजर आता हुं, अपने खेतो से बिछडने की सजा पाता हुं
गावाकडच्या शेतकरी कुटुंबातील, गाव सोडून शहरात गेलेल्या चाकरमानी माणसाच्या मनाला कधी न कधी पीळ पाडतोच वरील ओळीतील आशय . मात्र मागे राहिलेले ते गाव देखील अलीकडे सुजलाम सुफलाम वगैरे राहिलेले नाही . बाह्य बदल दिसतो खरा पण गेल्या दशकभरात नापिकी ,कर्जबाजारीपणा , महागाई,व शासकीय स्तरावरील अनास्था या मुळे गावचा पार मसनवटा होऊन गेला आहे .यंदा तर ग्रामीण भागात आधी अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले उत्पनावर मर्यादा आल्या. त्यातच बाजारभावात कापूस विकून झाल्यावर आता तेजी आली या मुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसते,दुसरीकडे बेरोजगारांच्या हातालाही काम नसल्याने एकूणच गावागाडा ठप्प पडला आहे.याचे दृश्य परिणाम बाजारपेठेत दिसतं असून तालुक्यात खरेदीची गर्दी यंदा ओसरली आहे. जिल्ह्याची पेठ ओसंडून वाहत असतांना तालुक्यावर मात्र उठाव नसल्याने सारेच हवालदिल झाल्याचे दिसते.
शहरांमध्ये लोकांचे उत्पन्न तुलनेने जास्त असल्याने तिथे फारसा फरक जाणवत नाही , नौकरीदार, बडे व्यावसायिक यामुळे त्यांची खरेदी करण्याची क्षमता अधिक असतेच यात दुमत नाही.शहरांमध्ये मोठ्या मॉल्स, सुपरमार्केट्स, विविध प्रकारचे दुकाने आणि ब्रँड्स उपलब्ध आहेत आणि तिथे ग्राहकांनी बाजारपेठ फुलल्याचे ही दिसते. विशेषतः सणाच्या लग्न सराई च्या वेळी शहरी बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने शहरांमध्ये अधिक लोकसंख्या व आर्थिक संपन्नता निर्माण होते ,त्या तुलनेत
कमी खरेदी क्षमता कमी उत्पन्न व ग्रामीण भागात शेतीवर आधारित अर्थव्यवस्था याचा फरक दरवर्षी पडतोच यंदा मात्र ही तफावत अधिक असल्याचे दिसते. ग्रामीण भागातील शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न फारच बिकट झाला आहे ,याचे सामाजिक दुष्परिणाम देखील पुढील काळात दिसतील .उच्च शिक्षण घेतलेले अनेक होतकरू तरुण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून चांगले उत्पन्न काढतात ,मात्र बाजारभावात त्यांची फसवणूक होते .हा वर्ग वजा केल्यास ग्रामीण भागातील मोठा युवावर्ग आज व्यसनाच्या आहारी गेला आहे .हाताला काम नाही ,शेतीत राम नाही अशी अवस्था असल्याने पुढील पिढी विनाशाच्या मार्गावर जाताना दिसते .शासन व प्रशासनाला याची कोणतीही चिंता नाही .शासकीय धोरणात ग्रामीण युवकांकरिता कोणतेही ठोस काम होत असल्याचे प्रतिबिंब उमट नाही .
तालुक्याचा विचार केल्यास राळेगाव शहर ही एक मोठी बाजारपेठ आहे.या ठिकाणी परिसरातील अनेक गावातून नागरीक खरेदी साठी येतात. लगतच्या वर्धा जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात ग्राहक या पेठेत दाखल होतात. वर्धा व यवतमाळ या दोन्ही पेठांचे अंतर अधिक असल्याने राळेगाव चे महत्व वाढले आहे. उन्हाळ्यात ,लग्न सराईत इथे प्रचंड गर्दी व खरेदीची झुंबड हे चित्र सार्वत्रिक दिसायचे या वेळी मात्र मार्केट मध्ये उदासी आहे.
शेतमजूरांच्या हातालाही काम नाही
अतिवृष्टीने यंदा हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन जागेवरच सडले,सोयाबीन सावंगणी चे काम देखील पडले नाही. कापसाचे सरासरी उत्पन्न घसरले ,कापूसच फुटलेला नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी होती . त्या मुळे सोयाबीन व कापूस या महत्वाच्या पिकांच्या हुलकावणी ने गावं पातळीवर कामच नाही. बाजारपेठेत उचल नाही. हाताला कामच नसल्याने लग्न हंगामावर देखील नापिकीचे सावट दिसते आहे .
