
सहसंपादक : : रामभाऊ भोयर
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाढोणा बाजार समिती येथे आज कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.
कापूस भावावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर जवादे, अंकुश मुनेश्वर, गजानन पारखी तसेच वाढोणा बाजारचे माजी उपसरपंच प्रकाश पोपट यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला.
सकाळपासून विमल अॅग्रो कॉटन जिनिंग व मीरा कोटेक्स जिनिंग येथे शेकडो वाहनांसह कापूस खरेदीसाठी गर्दी झाली. व्यापाऱ्यांकडून सरसकट ₹६८५० प्रति क्विंटल दराने खरेदीला सुरुवात झाली. तथापि, शेतकऱ्यांनी ₹७००० प्रति क्विंटल दराची मागणी केली होती.
कापसामध्ये २५ ते ३० टक्के ओलावा असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी कमी दर दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततची नापिकी आणि आसमानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून, शासनाने हमीभावाखाली खरेदी होऊ न देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा — सुधीर जवादे
“सीसीआयकडून कापूस खरेदीस अद्याप सुरुवात झालेली नसल्यामुळे खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित सीसीआय कापूस खरेदी सुरू करावी, ही आमची ठाम मागणी आहे.”
— सुधीर जवादे,
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, राळेगाव
