
प्रतिनिधी//शेख रमजान
वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. मंगला गावंडे या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप गावंडे, कु. सीमा रावते, कु. शुभदा बिडवई, कु. मनीषा कदम, कु. पूजा मस्के व कु. सविता तुपेकर हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत स्त्री-शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
आपल्या मनोगतात वक्त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले. त्यांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणावे, असे प्रतिपादन करण्यात आले.
महिला मुक्ती दिन व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण, विचारमंथन व प्रेरणादायी संदेशांच्या माध्यमातून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या भाषणातून स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक जबाबदारी आणि महिलांच्या सक्षमीकरणाविषयी सकारात्मक विचार मांडण्यात आले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट व आत्मविश्वासपूर्ण सूत्रसंचालन दहावीतील विद्यार्थी पार्थ महाजन व साक्षी पेंदे यांनी केले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी श्रावणी राजपल्लू यांनी आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, विद्यार्थी व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्त्री-शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन व महापुरुषांच्या विचारांचे संस्कार रुजवणारा ठरला. उपस्थित मान्यवर व पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
