
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव : इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दत्तकग्राम झाडगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. समाजाभिमुख शिक्षण, ग्रामविकास आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी, स्वयंसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी शिक्षणमंत्री मा. वसंतराव पुरके सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी युवकांना विज्ञान व तंत्रज्ञानाचा विधायक उपयोग करून ग्रामीण विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. “आजचा तरुण सक्षम आहे; फक्त त्याने आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरण्याची गरज आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना समाजकार्याच्या माध्यमातून नेतृत्वगुण विकसित करण्याचे मार्गदर्शन केले.उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले राळेगावचे उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील यांनी पाणलोट व्यवस्थापन, पडीक जमीन विकास आणि शाश्वत ग्रामविकास या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी जलसंधारणाच्या उपाययोजना, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. व्ही. सी. आडे सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. नीलिमा दवणे यांनी रासेयोचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध कॅम्प्सची माहिती दिली. त्यांनी प्रजासत्ताक दिन शिबिर (RDC), राष्ट्रीय एकात्मता शिबिर (NIC), साहसी शिबिरे (Adventure Camps), युवा नेतृत्व शिबिरे तसेच राज्यस्तरीय विशेष शिबिरे यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा “Best NSS Volunteer Award” हा पुरस्कार कसा मिळविता येतो, त्यासाठीची पात्रता व निकष याबाबत माहिती देत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्य करून हा मान मिळवावा, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी श्री. उमेश केवटे यांनी “डिजिटल अरेस्ट” व सायबर सुरक्षिततेवरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. गुरुदेव सेवामंडळ, झाडगावचे श्री. रमेशराव विलायतकर व श्री. हरिभाऊ कुबडे यांनी ग्रामगीतेचे महत्त्व पटवून दिले.
या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. वाय. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वप्नील गोरे यांनी केले असून महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री लोहकर व सहकार्यक्रम अधिकारी एम. व्ही. वानखडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील गोरे यांनी केले. सूत्रसंचालन कु. दीक्षा गोटे हिने तर आभार प्रदर्शन सानिका काकडे हिने केले.या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती, आरोग्य व पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होणार आहे.
