
(सामान्य नागरिकांची फसवणूक; मनसे जिल्हाउपाध्यक्ष शंकर वरघट यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धडक तक्रार व कारवाईची मागणी)
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी परिसरात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत (अवैध) ले-आऊटचे पेव फुटले असून, भूमाफियांनी प्रशासकीय नियमांना केराची टोपली दाखवत सर्वसामान्यांची फसवणूक सुरू केली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी उपविभागीय अधिकारी, राळेगाव यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राळेगाव तालुक्यातील वडकी विभागात अनेक ले-आऊट कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय परवानगीशिवाय उभारले जात आहेत. यात अनेक ले-आऊट धारकांनी कागदोपत्री जमिनीचे क्षेत्र वाढवून दाखवले असून, प्रत्यक्षात लगतच्या शासकीय जमिनीवर आणि गायराणावर अतिक्रमण केले आहे.
, हे ले-आऊट राष्ट्रीय महामार्गाला लागून आहेत. रस्ते विकास प्राधिकरणाची (NHAI) कोणतीही परवानगी न घेता, महामार्गाच्या अगदी कडेपर्यंत भूखंड पाडण्यात आले आहेत. भविष्यात रस्ता रुंदीकरणात येथे भूखंड घेणाऱ्या नागरिकांना बेघर व्हावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे, नियमानुसार ले-आऊटमध्ये मोकळी जागा (Open Space) सोडणे बंधनकारक आहे. मात्र, नफेखोरीसाठी व्यावसायिकांनी चक्क नाल्याच्या काठावर किंवा टाकाऊ जमिनीवर ओपन स्पेस दाखवून ग्राहकांची दिशाभूल केली आहे., ले-आऊटमधील रस्ते आणि भरावासाठी लागणारा मुरूम व वाळू कोणत्याही रॉयल्टीशिवाय उत्खनन करून वापरली जात आहे, ज्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, मनसे जिल्हाउपाध्यक्ष शंकर वरघट यांनी केवळ स्थानिक प्रशासनाकडेच नव्हे, तर मुख्यमंत्री (गृह व न्याय विभाग), पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आणि विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडेही निवेदनाद्वारे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
“भुमाफिया सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा लुटत आहेत. तातडीने मोजणी करून या अवैध ले-आऊटवर बुलडोझर फिरवला पाहिजे आणि दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. प्रशासनाने यावर काय कारवाई केली, याचा लेखी अहवाल मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.”
:- शंकर वरघट (मनसे जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ)
