
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेमुळे वाशीम जिल्ह्याच्या मंत्रिपदाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘भाकरी फिरविण्याच्या’ भूमिकेमुळे शिवसेनेतील काही मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्या भावनाताई गवळी यांचे नाव संभाव्य मंत्रिपदासाठी पुढे येत आहे.
सध्या राज्य मंत्रिमंडळात वाशीम जिल्ह्याला कोणतेही प्रतिनिधित्व नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत नाराजी आहे. मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वाशीमच्या विकासासाठी जिल्ह्यातील नेतृत्वाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी जनभावना अधिक तीव्र होत आहे. माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांना राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर गेल्या सुमारे २० वर्षांत जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
भावनाताई गवळी यांनी वाशीम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवत आपले मजबूत राजकीय अस्तित्व सिद्ध केले आहे. तसेच मालेगाव नगर पंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन करण्यात आणि रिसोड नगर परिषदेत पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी शिवसेनेला विक्रमी मते मिळवून देण्यात त्यांचे योगदान मानले जाते.
शिवसेनेतील फुटीनंतर त्या शिंदे गटात सामील होणाऱ्या पहिल्या खासदार ठरल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात शिंदे गटाचा जनाधार वाढल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील कामगिरीच्या आधारे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कामगिरीत कमी पडलेल्या मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत वाशीमसारख्या मागास जिल्ह्याला प्रतिनिधित्व देत राजकीय संदेश दिला जाणार का, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
संभाव्य फेरबदलाच्या हालचालींमुळे वाशीम जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, भावनाताई गवळी यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का, याबाबत पुढील काही दिवसांत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
