
ग्रामपंचायत निर्णय स्पष्ट; अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्रामपंचायत वनोजा येथील कर्मचारी नियुक्ती प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती राळेगाव कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर सकारात्मक सांगता झाली. प्रशासनाने दिलेल्या स्पष्ट ग्वाहीमुळे आणि ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर उपोषणकर्ते जितेंद्र खोडे, विकास घिनमिने, सुरज किन्हेकर आणि श्रीकांत बेलखडे यांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त करत उपोषण मागे घेतले.
ग्रामपंचायत वनोजा येथे कर्मचारी नियुक्तीबाबत ग्रामपंचायत सभेत चर्चा होऊन संबंधित कर्मचाऱ्याला रोजंदारी तत्त्वावर कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थायी नियुक्तीबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याने काही गैरसमज निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर संतप्त युवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
यासंदर्भात गटविकास अधिकारी केशव पवार व ग्रामपंचायत सचिव सुबोध चांगले यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत, संबंधित प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेशी निगडित असण्याची शक्यता असल्याने सध्या स्थायी नियुक्ती करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. शासन नियम व ग्रामपंचायत सभेच्या मंजुरीनंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ठोस ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशासनाच्या या स्पष्ट भूमिकेनंतर आणि सकारात्मक संवादामुळे उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या आश्वासनावर समाधान व्यक्त केले व उपोषणाची सांगता करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विस्तार अधिकारी म्हस्के, ग्रामपंचायत सरपंच मालुताई कोटनाके, ग्रामपंचायत सचिव सुबोध चांगले, माजी उपसरपंच प्रफुल तायवाडे, विदर्भ संपादिका ज्योत्स्ना करवाडे, गजानन मुरस्कार,अविनाश बेलखडे,सतिश वाळके,दिनेश कोटनाके,लक्ष्मीकांत उत्तरवार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यस्थीमुळे तोडगा, संवादातून निर्माण झाला विश्वास
ग्रामपंचायत वनोजा येथील कर्मचारी नियुक्ती वादावर तोडगा काढण्यात विस्तार अधिकारी म्हस्के, ग्रामपंचायत सचिव सुबोध चांगले आणि दैनिक युवक आधारच्या विदर्भ संपादिका ज्योत्स्ना करवाडे यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. उपोषणकर्ते जितेंद्र खोडे, विकास घिनमिने, सुरज किन्हेकर आणि श्रीकांत बेलखडे यांच्याशी समन्वय साधत प्रशासन व ग्रामपंचायत यांच्यात सकारात्मक संवाद घडवून आणण्यात आला. प्रशासनाची स्पष्ट भूमिका आणि माध्यमांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्यांचा विश्वास निर्माण झाला आणि तणावपूर्ण परिस्थिती शांततेत निवळून आमरण उपोषणाची सकारात्मक सांगता झाली.
