
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
तालुक्यामध्ये शंभर च्यावर गावांचा समावेश आहे. कित्येक लोक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालय ,पंचायत समिती भूमिअभिलेख, तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन बाल विकास प्रकल्प कार्यालय आदी कार्यालयात शेकडो नागरिक आपल्या कार्यालयीन काम करीता येत असतात परंतु या कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असून नागरिकाना हॉटेल किंवा पान टपरीवर विकतचे पाणी प्यावे लागत आहे मात्र याकडे कोणतेही अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. मार्च महिना संपत आला असून जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. उन्हाने जीवाची लाही लाही होत असताना मात्र शंभर किलोमीटर वरून येणारे नागरिक पहिले कार्यालयात आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा शोध घेत असतात परंतु कार्यालयात पिण्याचे पाणी नसल्याने अखेर नागरिकांना कार्यालयाच्या बाहेर जाऊन विकतचे पाणी प्यावे लागत आहे.
तालुक्यात तहसील कार्यालयाची भव्यदिव्य प्रशासकीय इमारत असून या इमारतीत कृषी विभाग पुरवठा विभाग निवडणूक विभाग संजय गांधी विभाग जमाबंदी विभाग दुय्यम निबंधक आदी कार्यालय आहे.या कार्यालयात सुरुवातीला नव्याने थंड पाण्याचे आरो बसविण्यात आले होते. तेव्हा नागरिकांना थंड पाणी मिळत होते परंतु मागील वर्षापासून हे आरो बंद पडले असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने आरो बंद अवस्थेत दिसून येत आहे. त्याच प्रमाणे नव्याने तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राची लाखो रुपयांची इमारत बांधकाम करण्यात आली मात्र या कार्यालयात पिण्याचे पाण्याची सोय नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे.तसेच पंचायत समिती कार्यालयात मागील दोन तीन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत शुद्ध व थंड पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली मात्र मागील पंधरा दिवसांपासून हे शुद्ध व थंड पाण्याचे आरो बंद पडले आहे. त्यामुळे येथील आरो प कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले असून तालुक्यातील येणाऱ्या शासकीय कार्यालयातील नागरिकांना त्याच्या पाण्यासाठी नाहक भटकावे लागत आहे. मात्र अधिकारी कुठलीही भूमिका घेताना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला जात आहे.
दिवसेंदिवस उन्हाचा पारा अधिकच चढत असल्याने नागरिकांची तहान भागविण्यासाठी त्या त्या संबधित प्रशासनाने कायमस्वरूपी मार्ग काढावा व पिण्याच्या पाण्याची नागरिकांची गैरसोय टाळावी, असे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
