
(प्रतिनिधी) शेख रमजान
तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार अमित वसंतराव देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने गंभीर गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरुद्ध ‘दर्पण’ पत्रकार संघ, ढाणकीच्या वतीने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘धाडस ००७’ या यूट्यूब न्यूज चॅनलचे संपादक अमित देशमुख यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तालुक्यातील अवैध दारू विक्री, जुगार, गांजा आणि गुटखा विक्री थांबवण्याची तक्रार केली होती. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही त्यांनी या अवैध व्यवसायांविरुद्ध आवाज उठवला होता.
१२ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या वेळी एका तक्रारदाराने बोलावल्यामुळे अमित देशमुख उमरखेड पोलीस स्टेशनला गेले होते. तिथे विचारपूस करत असताना, ठाणेदार शंकर पांचाळ यांनी जुन्या तक्रारीचा राग मनात धरून त्यांच्यावर तातडीने गंभीर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे मध्यरात्री उशिरा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
‘दर्पण’ पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय साललेवाड,प्रफुल चोरे, दिगंबर शिरडकर,प्रवीण जोशी,अशोक गायकवाड, सुनील मांजरे, महेबुब शेख, पवन वचेवार व सगळे सदस्य यांनी
उमरखेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत:
पत्रकार अमित देशमुख यांच्यावर आकसापोटी दाखल केलेले सर्व गुन्हे त्वरित मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा.
ठाणेदार शंकर पांचाळ यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांचे तातडीने स्थानांतर करण्यात यावे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी.
सुशिक्षित आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुण पत्रकाराचे शैक्षणिक आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जर अशा प्रकारे पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होत राहिले, तर समाजात चुकीचा संदेश जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
