
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव: तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आणि शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या घरांची बांधकामे खोळंबली आहेत. वाढत्या महागाईत रेती तस्करांकडून होणारी लूट थांबवून शासनाने लाभार्थ्यांना मोफत आणि ऑफलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राळेगाव तालुक्यामध्ये गरीब कुटुंब आणि शेतकऱ्यांसाठी विविध घरकुल योजना मंजूर झाल्या असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनातर्फे पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. सोबतच, शासनाच्या निर्देशानुसार हे बांधकाम तातडीने सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, घरकुल बांधकामासाठी अत्यंत आवश्यक असलेली रेती उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात घरकुल धारकांसाठी कोणत्याही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. याच संधीचा फायदा घेत रेती तस्कर अवाढव्य दराने रेतीची विक्री करून गरिबांची आर्थिक लूट करत आहेत.
वाढत्या महागाईमुळे आधीच सिमेंट, सळाखी आणि इतर बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत, त्यातच रेतीसाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत किंवा केवळ गाडी भाडे व मजुरी खर्च आकारून रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. अनेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याने ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येत आहेत, त्यामुळे ही रेती केवळ ऑफलाईन पद्धतीने आणि घरकुल यादीतील क्रमवारीनुसारच देण्यात यावी, जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत हा लाभ पोहोचेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन सादर करताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष सूरज लेनगुरे, प्रमोद सोनुले, ओम मडावी, रोशन गुरूनुले, ओंकार सर, निलेश टेकाम, तुषार वाघमारे, आकाश कोटनाके, योगेश आत्राम, नितेश आत्राम, आशिष वाघमारे, अजय मडावी, ऋषिकेश भोयर, ध्रूव किन्नाके, प्रफुल खंडालकर, यशकुमार चौधरी, परिवर्तन गोटे, दीप कलमकर
यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या निवेदनावर प्रशासन काय दखल घेते आणि घरकुल धारकांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
