
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण: राळेगाव तालुक्यातील किन्ही परिसरात महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे वीज केबलमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. या आगीत परिसरातील – झाडे-झुडपे जळून खाक झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी या घटनेबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तोंडी निवेदन देऊन तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली. या घटनेनंतर १५ दिवस उलटून गेले असतानाही संबंधित केबल अद्याप काढण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी सध्या अक्षरशः अंधारात आहेत. शेतात ज्वारी व कापूस पिकांना पाणी देणे अत्यंत आवश्यक
असताना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या घटनेचा अजूनपर्यंत महावितरण कंपनीकडून पंचनामा करण्यात आलेला नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. वीज वितरण वडकीचे अभियंता आशिष नागपुरे यांनी तत्काळ दखल घेऊन केबलची दुरुस्ती करावी. घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच निष्काळजीपणास जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभिमान मोहुर्ले यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.
